बाबा वारले तेव्हा त्यांनी सर्व काही — अपार्टमेंट, त्यांची टोयोटा गाडी, साठवलेले पैसे आणि गावाकडच्या शेतातला त्यांचा वाटा — सगळंच माझ्या भावाला, हाशिमला, दिलं. माझ्यासाठी, बहिणीसाठी, किंवा अम्मासाठी काहीच ठेवलं नाही. बहिणीच्या आणि माझ्या वाट्याला आलं ते फक्त बाबांचं नाव. माझी आई, जी पूर्वी त्यांची पत्नी म्हणून ओळखली जात होती, ती आता त्यांची विधवा झाली. माझ्या बहिणीने, ईशाने, मृत्युपत्रावर नाराजी व्यक्त केली नाही, उलट, तिला हे अपेक्षितच होतं, असं म्हणाली. मृत्युपत्रात आश्चर्य वाटण्यासारखं खरं तर काही नव्हतंच, तरीही माझ्या मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात एक आशा होती की बाबांनी या कुटुंबातील स्त्रियांचाही विचार केला असेल.
वकिलासोबतच्या भेटीदरम्यान ईशाने सरळ सांगितलं की तिला बाबांच्या मृत्युपत्राशी काही देणंघेणं नाही, आणि बाबांशीही नाही. मृत्युपत्रातील मजकूर वाचून झाल्यावर लगेचच ती तिच्या नवऱ्यासोबत वकिलाच्या ऑफिसमधून निघून गेली होती. कदाचित ईशाला कशाचीच गरज नव्हती. माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असूनही, ती तिच्या आयुष्यात स्थिरावली होती आणि तिला कसलीही कमतरता नव्हती. तिला तिच्या नोकरीत भरपूर पगार होता आणि नवरा नसीमसोबत, सासरच्या मंडळींच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय, तिचा शांत आणि सुखी संसार सुरू होता. गेल्या महिन्यात तर तिने त्यांच्या अपार्टमेंटसाठी घरकाम करणारी मदतनीस शोधायलाही सुरुवात केली होती. एका व्यावसायिक कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करणारा नसीम तिची आणि त्यांच्या एक वर्षाच्या मुलाची जबाबदारीही व्यवस्थित सांभाळत असे.
ईशाची मला फारशी चिंता नव्हती. काळजी होती ती अम्माची आणि माझी.
हाशिम माझा भाऊ असला, तरी पैशांचा वापर असो किंवा वागणं — दोन्ही बाबतीत तो कधीच धड नव्हता. आम्ही तिघंही एकाच गर्भात वाढलो, पण आमच्यापैकी कोणाचीही घडण सारखी नव्हती. ईशा कधीकधी उद्धट किंवा अलिप्त वाटली, तरी तिला माझी आणि अम्माची मनापासून काळजी होती. जेव्हा बाबा किंवा हाशिम तिच्याशी किंवा आमच्याशी कठोरपणे वागत, तेव्हा ती त्यांच्यावर कधीही आवाज चढवत नसे. उलट शांतपणे, सरळ मुद्द्याचं बोलत असे. ती बाबांना विरोध करायची, हाशिमशीही वाद घालायची, त्यामुळे तिचं लग्न माझ्याआधी लावून दिलं गेलं.
त्यांना माहीत नव्हतं की ज्या माणसाशी त्यांनी तिचं लग्न ठरवलं होतं, तो एक सज्जन आणि प्रेमळ व्यक्ती आहे. ईशाच्या आयुष्यात नसीमसारखा माणूस आणल्याबद्दल, मी आजही देवाचे आभार मानते.
हाशिम आमचा धाकटा भाऊ. माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान असूनही, तो स्वतः कमी काम करून इतरांकडून जास्त काम करवून घेणारा — हुकूमशहा असल्यासारखा वागायचा. आजही अम्मा हाशिमचं रोजचं जेवण त्याच्या टेबलावर आणून देते. आयुष्यात एकदाही त्याने जागचं उठून अम्मासाठी पाण्याचा ग्लास आणला नसेल. बाबांनी त्याला लहानपणापासूनच खूप लाडावून ठेवलं होतं. ते त्याला सगळी खेळणी घेऊन द्यायचे — अशी खेळणी, जी मला आणि ईशाला, आम्ही रडून रडून मागितली तरी कधी मिळाली नाहीत. आम्हांला माहीतही नसलेल्या अम्युझमेंट पार्कमध्ये त्याला घेऊन जाणं, त्याला गाडी चालवायला शिकवणं, जेव्हा त्याने एका रेस्टॉरंटमधील वेटरवर हल्ला केला, तेव्हा त्याला जामिनावर सोडवून आणणं, अशी न संपणारी यादीच होती. हाशिम अनेकदा कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यात अपयशी ठरला, तरी बाबांच्या तोंडून कधीही तक्रारीचं अवाक्षर निघालं नाही. पण जेव्हा मी मास्टर्स करायची इच्छा व्यक्त केली, तेव्हा मात्र ते प्रचंड संतापले.
आता सगळं काही हाशिमच्या हातात असल्यामुळे, तो आमच्याशी बाबांपेक्षा कितपत वेगळं वागेल असा मला प्रश्न पडला होता. आतून कुठेतरी वाटत होतं, तोही तसाच वागेल. कारण लहानपणापासून त्याने बाबांचंच अनुकरण केलं होतं.
मृत्युपत्राच्या वाचनानंतर, हाशिम, अम्मा आणि मी बाबांच्या टोयोटामध्ये — जी आता हाशिमची टोयोटा झाली होती — बसलो आणि घरी गेलो. हाशिम आमच्याशी, किंबहुना स्वतःशीच, मोठमोठ्याने बोलत असूनही, तो संपूर्ण प्रवास माझ्यासाठी आणि अम्मासाठी असह्य शांततेत पार पडला. दुःख आणि फसवणुकीचा भार मुकाट्याने सहन करणं जड झाल्याने, आम्ही मागच्या सीटवर एकमेकींना धीर देत एकमेकींचे हात घट्ट धरून ठेवले होते. मला माहीत होतं की अम्मा आतून खूप खचली होती. तिला फारसं काही नको असायचं, पण तिच्यासाठी सगळी मुलं सारखीच होती. बाबांसारखं तिचं फक्त हाशिमवर प्रेम नव्हतं. त्यांनी ते त्यांच्या शेवटच्या शब्दांतून, त्यांच्या मृत्युपत्रातून, आम्हांला सिद्धच करून दाखवलं होतं.
***
हाशिमचं खरं रूप समोर यायला फार वेळ लागला नाही. बाबांच्या अंत्यसंस्कारानंतर फक्त पाचच दिवस झाले होते. शनिवारची दुपार होती आणि अचानक त्याचा आवाज संपूर्ण घरभर घुमू लागला. तो आवाज इतका मोठा होता की शेजाऱ्यांना, अगदी रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनाही तो ऐकू गेला असेल याची मला खात्री होती. अम्माला आणि मला संतापाने थरथरत उभा असलेला हाशिम दिसला. त्याने हातात काहीतरी धरलेलं होतं.
“काय झालं?” अम्माने काळजीने विचारलं. “देव न करो, अजून काही वाईट बातमी तर नाही ना ?”
“या बिलावरच्या आकड्यांपेक्षा वाईट काय असू शकतं ?” त्याने ते बिल तिच्या हातात कोंबलं. तिने ते बिल नीट वाचलं. मग आधी माझ्याकडे बघून हाशिमकडे वळली. मी तिच्याकडून ते बिल घेतलं तेव्हा त्यावर बारा हजार रुपये आकारल्याचं मला दिसलं. मागच्या महिन्यात ते सुमारे दहा हजार होतं.
बाबा असताना त्यांनी कधी बिलांबद्दल कुरकुर केली नाही. रिकाम्या खोल्यांचे दिवे बंद ठेवायला मात्र ते कधीकधी सांगायचे. अम्मा तर या बाबतीत खूपच काळजी घ्यायची. वीज गेली की यु पी एस UPSवर ताण येऊ नये आणि बिल वाढू नये म्हणून ती घराबाहेरच्या जिन्याचा दिवाही बंद करून टाकायची. कधीकधी तर वॉशिंग मशीन जास्त वीज खातं म्हणून ती हातानेच कपडे धुवायची.
“मला काही समजत नाहीये, बेटा. इतक्या वेळा वीज जाते. हे लोक मुद्दामच बिल वाढवतात, तुला माहीत आहे ना,” अम्मा म्हणाली.
“हो, आपल्याशी वैर आहे म्हणून मुद्दाम वाढवतात !” हाशिम वैतागून उपरोधाने म्हणाला.
“हाशिम, अम्माशी बोलायची ही पद्धत नाही,” मी खंबीरपणे म्हणाले.
“हो हो,” तो दोन्ही हात हलवत नाटकीपणे म्हणाला. “पण ऐक, असे आकडे असलेली बिलं मी आता भरणार नाही, समजलं?”
“भरायची गरज नाही,” मी म्हटलं आणि पुटपुटले, “तसंही कधी भरली आहेत का तू…”
“काय म्हणालीस ?”
मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.
“आणि अजून एक,” त्याने माझ्या हातातून बिल घेतलं आणि आई व माझ्याकडे पाहत म्हणाला, “आता तुम्ही दोघींनीही थोडा हिस्सा द्यायची वेळ आली आहे असं मला वाटतं.”
“म्हणजे ? तुझं काय म्हणणं आहे ?” मी विचारलं.
“हिस्सा म्हणजे हिस्सा,” तो उपहासाने म्हणाला. “तू आणि अम्मा या घरात राहता, आणि हे घर बाबा माझ्या नावावर करून गेलेत. त्यामुळे तुमचंही काहीतरी देणं लागतं. तुमचा अर्धा वाटा द्या, असं म्हणतोय.”
“तू अम्माकडून, तुझ्या स्वतःच्या, दुःखात असलेल्या आईकडून, या घरात राहण्यासाठी भाडं मागतोयस ?” मी त्याचेच शब्द परत उच्चारले. माझ्या डोक्यात उसळलेल्या रागाने आणि गोंधळाने माझं भान हरपलं होतं.
“म्हणजे काय, परिस्थिती बिकट आहे,” माझ्या बाजूला रडत उभ्या असलेल्या अम्माकडे दुर्लक्ष करत तो निर्विकारपणे खांदे उडवत म्हणाला.
“मग तू तुझ्याच आईकडून भाडं मागून ती आणखी बिकट करणार आहेस का ?”
“मग तुझ्या मते, मी काय करू ?”
“नको नको,” मी त्याच्या हातातून बिल परत घेतलं आणि अम्माचा हात घट्ट धरला. “तू काही करू नकोस, तसंही कधी काय केलं आहेस ? मी आणि अम्मा दर महिन्याला तुला भाडं देऊ. आणि बिलांचाही आमचा अर्धा हिस्सा देऊ.”
“अर्धा नाही.”
“म्हणजे ? तू तुझा अर्धा भर, आम्ही आमचा. तेच बरोबर आहे.”
“हो, पण मी इथे राहत असतो, तर दिले असते पैसे.”
“म्हणजे तुला काय म्हणायचं आहे ?” माझ्या आईने आश्चर्याने विचारलं.
“ठीक आहे, आता सरळ सांगतो,” तो वैतागून म्हणाला. “बाबांनी गावाकडचं शेत माझ्या नावावर केलंय, म्हणून मी तिकडे जाऊन राहायचं ठरवलंय. तिथेच काम सुरू करणार आहे.”
“बेटा, तू आयुष्यभर शहरातच राहिला आहेस,” अम्मा म्हणाली. “गावाकडचं आयुष्य तुला माहीत नाही. तुझे बाबा सुद्धा सगळी जबाबदारी तिथल्या कामगारांवर किंवा शेतकरी नातेवाईकांवर सोपवायचे. तू जाऊ नकोस तिकडे. तू मला आणि तुझ्या बहिणीला इथे सोडून कसा जाशील ?”
“अम्मा, कुणीतरी ते सगळं सांभाळायला हवं, आणि ते मीच करणार आहे. बाबांना त्या शेतीतून भरपूर पैसा मिळायचा. आता मला ते सांभाळायचं आहे.”
“म्हणजे तू आम्हांला, अम्माला आणि मला, इथेच सोडून जाणार ?” मी विचारलं.
“मी काय करावं, असं तुला वाटतं, हं ? इथे राहिलो, तर तुम्ही म्हणाल, मी काही करत नाही. तिकडे गेलो, तर किमान काहीतरी शिकेन, काम करीन. कधीतरी पैसेही पाठवीन, काळजी करू नकोस.”
“आम्हाला पैशांची चिंता नाही, हाशिम,” अम्माच्या डोळ्यांत पाणी दाटलं. “तुला कळत नाही का, मी आणि सना इथे एकट्या कशा राहू ? हे कराची आहे. इथे शेजाऱ्यांवर सुद्धा विश्वास ठेवता येत नाही.”
“नको अम्मा, त्याला जाऊ दे. हाशिमने आयुष्यात काहीतरी करावं, असं मलाही वाटतं. जर तिकडे सगळं व्यवस्थित चाललं, तर तिथेच राहा. तुला कोणीही जबरदस्ती करणार नाही. नाही तर, परत ये. शेवटी हे घर तुझंच आहे ना !” मी कडवटपणे हसले.
“अर्थात ! मग तुला पण स्वातंत्र्य मिळेल उशिरापर्यंत बाहेर राहायचं, बरोबर ?”
“लाज वाटली पाहिजे तुला, हाशिम !” अम्मा त्याच्यावर ओरडली. “तुझी बहीण शिकवायला जाते. तू तिच्यावर केलेले आरोप मी अजिबात सहन करणार नाही.”
“हो ना ! ती नोकरी करणारी, कमावणारी बाई आहे, म्हणून तिच्याविरुद्ध काही ऐकणं तुला सहन होत नाही.”
अम्मा अखेर शांतपणे म्हणाली, “आता गप्प बस आणि निघ. उद्या जा, आजच जा, मी तुला
थांबवणार नाही. तुझ्या वडिलांच्या शेतावर जा.”
तो उपहासाने हसला. त्याने अम्माला किती दुखावलं होतं, याची त्याला काहीच पर्वा नव्हती. त्याच्या टोमण्यांनी मला काही फरक पडत नव्हता, त्यांना मी कधीच मनावर घेतलं नव्हतं. पण अम्माशी इतक्या असंवेदनशीलपणे वागणं मात्र माझ्या मनाला लागलं. ती खूप खचलेली दिसत होती आणि मी तिला सावरण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी ती पूर्णपणे हताश
होऊन डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसली आणि मनसोक्त रडली. त्याच्या खोलीत जाण्यापूर्वी, त्याने पुन्हा एकदा बिलाची, भाड्याची, आणि आम्हाला त्याच्या घरात राहू देतोय या त्याच्या मोठेपणाची आठवण करून दिली — तेच घर, जिथे आम्ही दोघंही लहानाचे मोठे झालो होतो.
आमच्या इमारतीबाहेरचा रस्ता सकाळच्या वेळेला नेहमी स्वच्छ असायचा, कारण सफाई-कामगारांनी आदल्या दिवसाचा सगळा कचरा झाडून टाकलेला असे. शहर आणि त्यातले रहिवासी अजूनही हळूहळू जागे होत असल्यामुळे तो रस्ता निर्मनुष्यही असायचा. काही जण माझ्यासारखे पहाटेच्या नमाजाला उठायचे, काही जण गजर वाजल्यावर, तर काही जण दुपारपर्यंत झोपून राहायचे.
सकाळी रिक्षा मिळवणं फार कठीण नव्हतं. सकाळच्या वेळी मी कराचीच्या प्रेमात पडू शकायचे. गजबजलेले रस्ते, अरुंद गल्ल्या, अंधुक जिने, सगळंच त्या वेळेला कसं नीटनेटकं दिसायचं. रस्त्यांवर सकाळच्या हवेत एक सौम्य शांतता दरवळायची. गाड्यांचे हॉर्न फारसे ऐकू येत नसत; रिक्षावाले एकमेकांवर चुकीच्या बाजूने गाडी चालवली म्हणून ओरडत नसत; आणि लोकांना रस्ता ओलांडू द्यायला ड्रायव्हर संयमाने थांबत. एवढ्या सकाळी कुणालाच उगाच चिडचिड करून घाई करण्याची उसंत नसायची. सगळ्यांना आपापल्या कामाला पोहोचायचं असायचं.
रिक्षाच्या मागच्या बाजूला मला माझ्या उजव्या पायाच्या एका भागावर सूर्यकिरणांचा स्पर्श जाणवला. क्षणभर त्या उष्णतेने ऊब दिली आणि त्या सौंदर्याने मी भारावून गेले. त्या तेजस्वी प्रकाशकिरणांखाली माझ्या पायाच्या पुढच्या भागावरची जन्मखूण मला दिसली. सूर्यप्रकाशात ती अधिकच स्पष्ट दिसत होती. मी लहान असताना, माझ्या चेहऱ्यावर असलेल्या जन्मखुणांबद्दल मला संकोच वाटायचा. सगळ्यांच्या नजरेत भरणाऱ्या त्या यातनांच्या पारदर्शक खुणा आहेत, असं मला वाटायचं. माझ्या शाळेतल्या मुलींच्या चेहऱ्यावर एखाददुसरी ठसठशीत खूण असायची आणि ती त्यांच्यावर छानही दिसायची. पण माझ्या चेहऱ्यावर तर अशा आठपेक्षा जास्त खुणा विखुरलेल्या होत्या. मग अम्माने जन्मखुणांना माणसाचं वैशिष्ट्य म्हणत माझा विचाराला वेगळं वळण दिलं. मला आठवलं की तिच्या त्या बहुपयोगी वहीत — ज्यात ती कधी पाककृती, कधी जुन्या मैत्रिणींचे फोन नंबर, तर कधी कवितांच्या ओळी लिहायची, त्यात तिने या शब्दाचं सिंधीतील स्पेलिंग
लिहून ठेवलं होतं : ‘تل’.
“किती सुंदर आहे ना हे ?” लिहिताना ती मला तिच्या मांडीवर बसवायची. “किती नाजूक आहे हा शब्द — ‘तिल’. नाजूकपणात लाज वाटण्यासारखं काही नसतं. तुझ्या या खुणा जणू तारे आहेत, आणि त्या सगळ्या मिळून एक सुंदर नक्षत्र तयार करतात. लोक तारे आणि नक्षत्रांकडे कौतुकाने बघतात, मग तू स्वतःकडे कमीपणाने का पाहावंस ?”
उन्हाची झळ तीव्र झाल्यावर मी पाय हलकेच रिक्षातल्या सावलीच्या भागात घेतले. शाळेच्या गेटपाशी रिक्षा थांबली, मी ड्रायव्हरला भाडं दिलं. गेटवरच्या सुरक्षारक्षकाला नमस्कार केला, तेव्हा त्याने माझं सांत्वन केलं. मी माझ्यामागे असलेल्या काही विद्यार्थ्यांना पुढे जाऊ दिलं, आणि ते माझ्याकडे असे बघत होते, जणू काही त्यांनी भूत पाहिलं आहे.
आज बरीच कामं करायची होती. आठवडाभर मी शाळेत नव्हते, पण मी शिकवत असलेल्या तीन वर्गांच्या आज चाचण्या होणार होत्या. त्या उत्तरपत्रिका या आठवड्याच्या शेवटपर्यंत तपासून पूर्ण करायच्या होत्या कारण पुढच्या आठवड्यात अजून दोन वर्गांच्या चाचण्या होणार होत्या.
स्टाफरूममध्ये शिक्षकांपेक्षा कागदपत्रंच जास्त असत. सगळेच शिक्षक एक तर कामाच्या ओझ्याखाली दबलेले होते किंवा त्यांना कमी पगार होता किंवा दोन्हीही होतं. कोणीही कुणाकडून मदत मागत नसे, आणि गोंधळ होण्याच्या आणि पकडलं जाण्याच्या भीतीने कोणीही आपलं काम दुसऱ्याला देण्याची चूकही करत नसे. स्टाफरूममध्ये प्रवेश करताच माझे सहकारी माझ्याकडे सहानुभूतीने पाहतील, अशी मला अपेक्षा होती, आणि माझा अंदाज खरा ठरला. त्यांच्या मनातले विचार जणू मला ऐकू येत होते — हीच ती शिक्षिका जिचे वडील गेलेत. मी तिची थोडी जास्त विचारपूस केली तर ती रडेल का ?
प्राचार्या स्टाफरूममध्ये होत्या. त्या माझ्यासाठीच थांबल्या आहेत, हे मला कळलं, कारण त्या माझ्या डेस्कपाशी उभ्या होत्या. इतर शिक्षकांच्या निःशब्द नजरा टाळत मी त्यांना नमस्कार केला. मला वाटलं तर मी आज लवकर जाऊ शकते, त्या समजून घेतील, असं त्यांनी मला सांगितलं.
मी त्यांच्या या समजुतीबद्दल आभार मानले, पण सांगितलं की, माझा तास आहे, म्हणून मला वर्गात जायचं आहे. आणि त्यांना तिथेच उभं ठेवून मी निघून गेले.
***
जसजसं वय वाढतं तसतसं माणूस आपल्या जवळच्या लोकांशी स्वतःबद्दल कमी बोलायला लागतो. आम्हांलाही बाबांबद्दल फारसं काही माहीत नव्हतं. ते त्यांच्या तरुणपणीच्या आठवणींना ‘आठवत नसलेला भूतकाळ’ म्हणत, त्याबद्दल क्वचितच आमच्याशी बोलायचे. कधीतरी त्यांनी सांगितलेल्या गोष्टी इतक्याच — कॉलेजमध्ये ते नेहमी वर्गात पहिल्या क्रमांकावर असायचे; त्यांनी डब्ल्यू ए पी डी ए मध्ये काम केलेली वर्षं, ज्या संस्थेबद्दल मी माझ्या माध्यमिक शाळेतल्या समाजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात एकदा वाचलं होतं आणि मला त्यांचा अभिमान वाटला होता; आणि एकदा आईला लग्नाची मागणी घालताना त्यांनी केसांना इतकं जास्त तेल लावलं होतं की आई त्यांना त्यावरून नकार देईल याची त्यांना खात्री होती.
फारसं काही नव्हतंच. ज्या माणसामुळे मी, ईशा आणि हाशिम अस्तित्वात आलो, त्या माणसाला आम्ही खरं तर कधी ओळखलंच नव्हतं. बाबांना स्वतःबद्दल बोलायला कधीच आवडत नसे. अर्थातच, त्यांनी मला, ईशाला आणि अम्माला कधीही आपल्या कुटुंबासारखी वागणूक दिली नाही, याबद्दल आमची त्यांच्याविरुद्ध तक्रार होतीच. आम्ही जवळ आलो, तर कदाचित त्यांच्या आतलं काही उघड होईल, ते कमकुवत दिसतील, या भीतीने ते आमच्यापासून नेहमी एक अंतर ठेवूनच वागले. त्यांना कधी वाटलंच नाही की आम्ही त्यांना आधार देऊ शकलो असतो. मुलांनी आईवडिलांना सांभाळणं हे त्यांच्या दृष्टीने कदाचित हास्यास्पद होतं, कमीपणाचं होतं. शेवटी आम्हांला त्यांना ओळखायची संधीच मिळाली नाही.
आपण आपल्या वडिलांना खरंच कधी ओळखतो का, किंवा कधी ओळखू शकतो का, असा मला प्रश्न पडायचा.
माझ्या शाळेपासून काही मैलांवर असलेल्या एका बागेत बसून मी हा विचार करत होते. मी अम्माला किंवा ईशाला सुद्धा कधी सांगितलं नव्हतं की कधीकधी कामानंतर मी क्लिफ्टन पार्कमध्ये फिरायला जाते. दिवसभराचा ताण हलका करण्यासाठी आणि भूतकाळातील, वर्तमानातील व भविष्यातील घटनांबद्दल विचार करण्यासाठी मी हे करत असे. शहरात वाढत चाललेल्या छोट्या-मोठ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर, कुणालाही न सांगता तिथे जाणं धोकादायक होतं, हे मला ठाऊक होतं. पण दिवसातून एकदा तरी, काही क्षणांसाठी मला सगळ्यांपासून दूर व्हावंसं वाटायचं. कोणतंही ओझं न बाळगता, माझ्या चालणाऱ्या पावलांनीच मला भारातून मुक्त करावं असं मला वाटायचं.
काही आठवड्यांपूर्वी प्राचार्यांनी सगळ्या शिक्षकांना एका स्टाफ-मीटिंगसाठी बोलावलं होतं. विद्यार्थ्यांची चाचण्यांमधील कामगिरी सुधारणं हा त्यामागील उद्देश होता, म्हणजे, विद्यार्थ्यांनी स्वतःहून मेहनत करण्याची तसदी घेतली नाही तरीही शिक्षकांनी मात्र दुप्पट कष्ट करायचे. दुसरं कारण म्हणजे, स्वच्छतागृहांमध्ये होणारी छुपी गुंडगिरी. एका विद्यार्थ्याने, दोन मुली एकमेकींना मारहाण करत असल्याचा आणि दुसऱ्या एका मुलीचे केस ओढत असल्याचा व्हिडिओ गुपचूप रेकॉर्ड केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, जिथे लोकांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल शाळा-प्रशासनावर टीका केली होती. दुसऱ्या दिवशी प्राचार्यांनी त्या तिन्ही मुलींना आपल्या ऑफिसमध्ये बोलावलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या पालकांनाही चर्चेसाठी बोलावलं. जीवशास्त्र शिकवणाऱ्या फराहकडून मला कळलं की मारहाण करणाऱ्या दोन्ही मुलींना एका महिन्यासाठी शाळेतून निलंबित करण्यात आलं आहे, आणि त्यांना त्या मुलीसाठी, तिच्या कुटुंबासाठी आणि शाळा-प्रशासनासाठी माफीचं पत्र लिहायला सांगितलं गेलं आहे. शेवटची गोष्ट जरा अति होती, पण तिचा संबंध कदाचित शाळेच्या प्रतिष्ठेशी असावा.
माझ्या असं लक्षात आलं की आजकालचे विद्यार्थी आपल्या कृतींच्या परिणामांची फारशी पर्वा करत नाहीत. ते अल्पवयीन आहेत म्हणून, किंवा त्यांचे श्रीमंत पालक काहीतरी मार्ग काढतीलच याची खात्री असते म्हणून, त्यांना वाटतं की ते काहीही करू शकतात. काही जण तर त्यांच्या शिक्षकांशीही उर्मटपणे बोलतात. माझ्या विद्यार्थ्यांपैकी कोणी मला काही अपमानकारक बोललं तरी मला वाईट वाटत नसे, मला ते मजेशीर वाटायचं. त्यांनी माझ्या वजनावरून, माझ्या कुरळ्या केसांवरून किंवा माझ्या सावळ्या रंगावरून माझी चेष्टा केली तर मला वाईट वाटेल, हा त्यांचा विचार मला गमतीशीर वाटायचा.
हे सगळं मनात घोळवत मी चालत होते, तेवढ्यात माझ्या खांद्यावर कोणीतरी थाप मारली, आणि मी दचकले. मागे वळून पाहिलं, तर एक टक्कल पडलेला, मध्यमवयीन माणूस धापा टाकत समोर उभा होता. त्याच्या शर्टच्या गळ्याभोवती घामाचं वलय उमटलं होतं, आणि काखेत काळे डाग पडलेले दिसत होते. मी गोंधळून त्या माणसाकडे पाहिलं, त्याला ओळखण्याचा खूप प्रयत्न केला, पण ओळखू शकले नाही.
“काय हो ?” मी विचारलं.
“माफ करा, मला एक मिनिट श्वास घेऊ द्या,” तो धापा टाकत म्हणाला.
तो माझ्यापर्यंत धावतच आला असावा, अशी मला शंका आली. तो सावरला, तेव्हा त्याने त्याचा हात पुढे केला. त्याच्या
हाताच्या तळव्यात काहीतरी छोटंसं, गडद रंगाचं दिसलं. मी नीट पाहिलं. ते माझंच, माणकाचं कानातलं होतं. नकळत मी माझ्या कानाला हात लावला, आणि डाव्या कानात काही नसल्याचं मला जाणवलं.
“हे बहुतेक तुमचंच आहे,” तो हात पुढे करत म्हणाला. “तुमच्या पुढे काही बायका चालत होत्या. आधी मला वाटलं, त्यांचं असेल, पण त्यांच्या कानांत वेगळीच कानातली होती. मग तुम्ही याच रस्त्याने जाताना दिसलात, आणि आता मला दिसतंय की हे नक्की तुमचंच आहे, घ्या.”
त्याने माझ्या हातात ते कानातलं दिलं, आणि मी त्याचे मनापासून आभार मानले. मग तो हळूच निघून गेला. मी त्या कानातल्याकडे पाहिलं, एक पिढ्यान्-पिढ्यांचा ठेवा — अम्माला तिच्या लग्नात नानीने सोपवलेलं, अम्माने माझ्या स्वाधीन केलं होतं. त्या अनोळखी माणसाच्या प्रामाणिकपणामुळे माझ्या मनाला हलकासा दिलासा मिळाला. काही लोकांना दुसऱ्याचं काही ढापायला क्षणभरही लाज वाटत नाही, हे माहीत असल्यामुळे त्या माणसाचा प्रामाणिकपणा मनाला स्पर्शून गेला. अशा चांगुलपणासाठी कृतज्ञता व्यक्त करणं पुरेसं असतं का, की ती अपुरी पडते, असा कधीकधी प्रश्न पडतो.
***
दुपारची गर्दीची वेळ त्रासदायक असायची. रस्त्यावरचा प्रत्येकजण वैतागलेला आणि दिवसभराच्या कामानंतर किंवा शाळेनंतर लवकरात लवकर घरी पोहोचायच्या घाईत असायचा. कोण आधी घरी पोहोचेल याची जणू एक शर्यत लागलेली असायची. एम. ए. जिन्ना रोडवर रिक्षा यू-टर्न घेत होती, आणि समोरून येणाऱ्या गाड्यांच्या कर्कश हॉर्नच्या आवाजाने माझं डोकं ठणकायला लागलं होतं. त्या गर्दीमुळे मी अक्षरशः थकून गेले होते. मला एक कप चहाची नितांत गरज होती. एखाद्या नदीकडून येत असावा असा कुबट वास मला सतर्क राहायला भाग पाडत होता. तो गेल्यावर मी रिक्षाच्या बाजूला रेलून बसले, बाहेर पाहिलं, वर पाहिलं. या शहरासारखं, पक्ष्यांनी व्यापलेलं आकाश कुठेच दिसत नाही. ते आकाश आपलंच समजून उडतात, झेपावत, खेळत, मुक्तपणे नाचतात. त्यांना असं अभिमानाने भरलेलं पाहणं हा माझ्यासाठी एक विशेष अनुभव होता.
भिट्टाई हॉल जवळ येताना दिसताच मी रिक्षावाल्याला त्याच्या दोन गल्ल्या आधीच थांबायला सांगितलं. मला थोडी सफरचंदं आणि टोमॅटो घ्यायचे होते. मी सांगितलेल्या ठिकाणी रिक्षा थांबली आणि मी त्याला पाचशे रुपये दिले. रोजच्या रोज ये-जा करताना आठशे-नऊशे रुपये खर्च होणं मनाला बोचणारं होतं. दोन गल्ल्या पुढे चालत गेले, तर भाजी-मंडईभोवती माणसांची गर्दी उसळलेली — पुरुष, बायका, बाइकवरचे लोक, शाळकरी मुलं — सगळेच. आधी मी नेहमी जिथून भाजी घेते त्या दुकानाकडे गेले. तिथून चांगले पिकलेले टोमॅटो, अम्माला आवडणारी भेंडी, ताजी कांद्याची पात आणि एक किलो छोटे बटाटे घेतले. शेजारच्या फळांच्या टपरीवर छान दिसणारी केळी होती, ज्यांना पाहून माश्यासुद्धा आकर्षित होत होत्या.
“केळी कशी दिली, भाई ?” मी केळ्यांकडे बोट दाखवत विचारलं.
“बाजी, दोनशे रुपये किलो,” तो दुसऱ्या ग्राहकाला संत्री देत म्हणाला.
“दोनशे ? गेल्याच आठवड्यात तर एकशे ऐंशी होते ना ?”
“बाजी, महागाई आहे, मी तरी काय करू ? हवं असेल तर अर्धा किलो शंभरला ला देतो.”
“ठीक आहे. आणि अर्धा किलो संत्री आणि एक किलो सफरचंदंही द्या.”
त्याला ४३० रुपये देऊन, मी अशा खरेदीसाठी नेहमी ठेवत असलेल्या एका रिकाम्या पिशवीत फळं आणि भाज्या घेऊन निघाले. त्या अरुंद रस्त्यात दरवळणाऱ्या तळलेल्या समोशांच्या आणि रोल्सच्या वासाने माझी भूक चांगलीच चाळवली गेली. शेवटी मी चार समोसे, तीन व्हेज रोल्स, आणि उद्याच्या नाश्त्यासाठी थोडही सुजी घेतली.
सर्व खड्डे चुकवत आणि समोरून येणाऱ्या सायकलींमधून वाट काढत, काळजीपूर्वक घराकडे चालत असताना, माझ्या पायांना माती लागल्याचं जाणवलं. ते वाळूने माखलेले आणि उघडे वाटत होते. मी स्वतःला बजावलं की उद्यापासून सँडल घालायचे नाहीत, फक्त शूजच घालायचे. जेव्हा मी आमच्या इमारतीचा अंधारा जिना चढून वर आले, तेव्हा घरी पोहोचल्याच्या विचारानेच मी सुटकेचा निःश्वास टाकला. बेल वाजवल्यावर काही क्षणांतच आईने मला पाहिलं आणि मी तिला पाहिलं. तिने गेट उघडून माझं स्वागत केलं आणि मी तिची विचारपूस केली. मग मी गेट आणि दार लावून घेतलं.
बाहेरची उष्णता इतकी तीव्र होती की घरी परत येताच, छतावरच्या पंख्यांच्या थंड हवेमुळे मला लगेच शांत आणि प्रसन्न वाटलं. पूर्णपणे ताजंतवानं झाल्यावर, खरेदी केलेल्या वस्तू मी जेवणाच्या टेबलावर ठेवल्या. सॅंडल्स काढत मी अम्माला केळ्यांचे भाव कसे वाढले आहेत हे सांगितलं. भिंतीवरच्या घड्याळाकडे नजर गेली आणि मला गंमत वाटली की शहरातल्या एका तासाच्या कामाला वाहतूक-कोंडीमुळे कधीकधी तीन तास लागू शकतात.
“इथे गरीब माणसांनी कसं निभावायचं, याची कुणालाच पर्वा नाही,” ती म्हणाली.
“अगं, मी समोसे आणि सुजी आणलीय. तीच उद्यासाठी ठेव,” मी शाल काढून, ती कोट-रॅकवर टांगत म्हणाले.
“बाहेरून जास्त तेलकट आणि तळलेले पदार्थ आणत जाऊ नकोस.”
“अम्मा, अधूनमधूनच आणतो ना आपण, चालतं अगं. मी हातपाय धुवून घेते, मग आपण जेवायला बसू.”
मी माझ्या खोलीतून कपडे आणि टॉवेल घेऊन येत होते, तेवढ्यात अम्माने मला हाक मारली. तिच्या हातात प्लेट होती, त्यात समोसे आणि रोल्स होते आणि तिच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव होते.
“सना, अगं एवढं सगळं का आणलंस?”
“का म्हणजे? आपल्या सगळ्यांसाठी.”
“यांचा आकार बघता, एका व्यक्तीला एक समोसा पुरे होईल.”
ती ‘एका माणसाला एक समोसा’ म्हणाली, तेव्हा माझ्या लक्षात आलं. पुढच्या वेळी लक्षात ठेवीन, असं मी तिला सांगितलं. मी पटकन आंघोळ करायला बाथरूममध्ये गेले. बाबा आता आमच्यासोबत जेवायला बसणार नाहीत, हे विसरण्याचा वेडेपणा मी केला होता.
***
“नसीम सध्या जरा काळजीत आहे,” ईशा म्हणाली.
“नाही, नाही, देवाच्या कृपेने सगळं ठीक होईल. मला खात्री आहे की त्याला ते पद मिळेल, तो सक्षम आणि पात्र आहे.”
“त्याचा स्वतःवर विश्वास नसतो,” ती उसासा टाकत म्हणाली, “मी त्याला कितीही प्रोत्साहन दिलं तरी तो आणखीच अस्वस्थ होतो.”
“पुढच्या वेळी मी त्याच्याशी बोलेन. कदाचित त्याला समजेल.”
ईशा हसली, “काय माहीत !”
फोनवर ईशाचा आवाज तुटत होता, म्हणून मी तिला तिचा प्रश्न पुन्हा विचारायला सांगितलं. तिचा आवाज नीट ऐकू यावा म्हणून मी फोनचा आवाज वाढवला, तेव्हा तिने पुन्हा विचारलं,
“हाशिम फोन करतो का ?”
हाशिम. गावाला पोहोचल्यावर त्याने आम्हांला एकदा फोन केला होता, आणि व्हॉट्सॲपवर आईला फक्त अधूनमधून व्हॉइस नोट्स पाठवायचा. तो म्हणाला की तो काम करत आहे आणि बाबांच्या भावांकडून आणि चुलतभावांकडून शेती कशी सांभाळायची हे शिकत आहे. त्याच्या त्या सांगण्यामध्ये किती तथ्य असेल, याची मला शंका आहे. तो कधीच गोष्टी जशा आहेत तशा सांगत नसे.
“तो जास्तकरून अम्माशीच बोलतो,” मी सूर्यफुलाच्या बीचं टरफल दाताने सोलून आतली छोटी बी खाल्ली.
“मला त्याची काळजी वाटते.”
“आपल्याला सगळ्यांनाच त्याची काळजी वाटते.”
“नाही, माझ्या काळजीचा अर्थ फक्त त्याच्या कृत्यांमुळे आपल्याला होणाऱ्या त्रासापुरता नाहीये,” ईशाच्या आवाजात चिंता होती, “माझं म्हणणं असं आहे की तो आपल्या सगळ्यांपेक्षा बाबांच्या जास्त जवळ होता. बाबांच्या मृत्यूचा त्याला खूप मोठा धक्का बसला असणार.”
“हाशिमला खरंच काही फरक पडत नाही. जाण्यापूर्वी तो फक्त पैशांबद्दलच बोलत होता.”
“आता तो स्वतःला घरचा प्रमुख समजतो म्हणून असेल. तुमच्यासाठी काही करावं असं त्याला वाटत असेल. कोण जाणे.”
“तो लहानपणापासूनच कधी सुधारला नाही, तर आता बाबा गेल्यानंतर तो बदलेल, असं तुला खरंच वाटतं ?”
“दुःख माणसाला बदलून टाकतं, सना. मला माहीत आहे की तुझ्या आणि माझ्या मनात बाबांबद्दल कडवटपणा आहे, पण हाशिमचा त्यांच्यावर जीव होता. मी चुकीचीही असू शकते, पण कदाचित त्यांच्या जाण्यानंतर तो स्वतःला बदलायचा प्रयत्न करत असेल. तू एकदा त्याला फोन कर. माझा फोन तो उचलत नाही, पण तुझ्याशी कदाचित बोलेल. त्याला एकटंही वाटत असेल.”
हाशिम आणि बाबा यांच्यात नक्कीच खूप जवळीक होती. तो जवळजवळ प्रत्येक क्षणी त्यांच्यासोबत असायचा. तो बाबांकडून चालायला शिकला, त्यांच्याबरोबर मशिदीत जायचा आणि बाबांशी चर्चा करण्यासाठी त्यांच्याच मालिका बघायचा. एका प्रकारे, बाबांना जाणून घेण्यासाठी तो आमच्याइतकाच आतुर होता. तो आमच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्यामुळे यात यशस्वी झाला. म्हणून मला प्रश्न पडला की हाशिमचं शेतावर जाणं हा बाबांचा सन्मान राखण्याचा प्रयत्न होता की बाबांच्या अगणित आठवणींनी भरलेल्या या घरातून पळून जाण्याचा, की दोन्हीही. मी त्याला बाबांच्या अंत्यविधीच्या वेळी किंवा मृत्युपत्राच्या सुनावणीच्या वेळी रडताना पाहिलं नव्हतं, उलट तो खूप बडबड करत होता. पण मग, जर मी त्याच्या दुःख व्यक्त करण्याच्या पद्धतीवरून त्याच्याबद्दल मत बनवलं असेल, तर माझ्यामध्ये आणि स्टाफरूममधल्या त्या न्याहाळणाऱ्या नजरांमध्ये काय फरक होता ?
काम आटोपल्यावर चालत जाणं, आणि चालून झाल्यावर बागेतल्या एखाद्या बाकावर बसून थोडा विसावा घेणं हा एक मोठा दिलासा वाटायचा. मी कधीकधी कोणताही विचार न करता, पण भावनांनी भारलेल्या अवस्थेत तिथे नुसती बसून राहायचे. इथे आल्यावर अधूनमधून जुन्या आठवणी मनात दाटून यायच्या, पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून झाडांवर लक्ष केंद्रित करायचे. मंद वाऱ्यावर त्यांची हलकी डोलणारी हालचाल मनाला आनंद देऊन जायची.
बागेतल्या रॉबिन पक्ष्यांचं आणि चिमण्यांचं मंजुळ गाणं हे तिथे परत येत राहण्याचं कारण होतं. शहराच्या गोंगाटात पक्ष्यांचे आवाज ऐकू येणं जवळजवळ अशक्य होतं. आमच्या बाल्कनीत आम्हांला अनेकदा कबुतरांचं घुमणं ऐकू यायचं, पण रहिवासी इमारती, शॉपिंग मॉल्स आणि कॉर्पोरेट इमारती यांच्या दाट गर्दीत चिमण्यांचा किंवा पारव्यांचा किलबिलाट कधीच ऐकू आला नाही.
माझ्या डोळ्यांसमोरच मला अशीच एक काँक्रीटची वास्तू दिसत होती — आयकॉन टॉवर. उंच, दिमाखदार, आव्हान देत उभी. मी माझ्यासमोरच्या झाडांकडे पाहण्यासाठी वळले; अशी सजीव रूपं, जी आपल्या प्रत्येक हालचालीतून आणि स्थिरतेतून, प्रत्येक पारदर्शकतेतून आणि सावलीतून आपल्या कथा सांगत होती. जेव्हा वाऱ्याच्या झोताने ती झाडं एका सुरात डोलू लागली, तेव्हा मी डोळे मिटून त्यांच्या गोष्टी ऐकू लागले. ती समाधानी आणि कृतज्ञ होती. पण आपण इतके व्यग्र असतो की, क्षणभर थांबून आपल्या सभोवतालच्या निसर्गाचं म्हणणं ऐकण्यासाठी आपल्याला वेळच मिळत नाही. दूरवरून हॉर्नचा कर्कश आवाज ऐकू येत होता. पण मी इथे होते, झाडांचं ऐकण्यात हरवलेली… तुमच्या या मुळांखालच्या शांत शहाणपणात मला थोडंसं सामावून घ्या… जेणेकरून मीही जमिनीशी जोडलेली राहू शकेन.
मी आकाशात निर्धास्तपणे उडणाऱ्या पक्ष्यांकडे पाहिलं, आणि खाली, बागेतल्या भुकेल्यांकडेही. त्यांचं घर आकाशातही होतं, आणि जमिनीवरही. त्यांच्या त्या नशिबाची मला मजा वाटली. मी माझ्या घड्याळात वेळ पाहिली, आणि माझ्या लक्षात आलं की आता घरी जायलाच हवं. अम्मा वाट पाहत असेल, ती एकटीच असेल. आज कपडे धुवायचं ठरलं होतं.
आज फराहने मला दोन कादंबऱ्या दिल्या होत्या — टोनी मॉरिसन यांची ‘जॅझ’ आणि जेन ऑस्टिन यांची ‘सेन्स अँड सेन्सिबिलिटी’. माझ्यासारखी इंग्रजी कादंबऱ्या वाचणारी फराह ही एकमेव दुसरी शिक्षिका असल्यामुळे, मी अधूनमधून तिच्याकडून पुस्तकं घ्यायचे, किंवा चांगल्या समकालीन कादंबऱ्यांची तिला नावं विचारायचे. मी घेतलेली पुस्तकं साधारणपणे आठवड्याभरात परत करायचे, पण सराव-परीक्षांचा हंगाम सुरू झाल्यामुळे, ती परत करायला कदाचित महिना लागायची शक्यता होती.
मी बऱ्याच दिवसांपासून पुस्तकाला हातही लावला नव्हता. ज्या गोष्टींमध्ये मला पूर्वी रस वाटायचा, जसं की वाचन, टीव्ही-मालिका पाहणे आणि घरातलं बागकाम, त्या सगळ्या गोष्टींमधली माझी आवडच बाबा गेल्यानंतर विरून गेली होती. माझ्या शेल्फवरच्या पुस्तकांवर धूळ साचली होती आणि टीव्ही चादरीखालीच झाकलेला होता. त्यावर कोणी काहीच पाहत नसे, फक्त बाबाच मोठ्या आवाजात बातम्या बघायचे. आमच्या बाल्कनीतल्या कुंड्यांमधली रोपं केव्हाच सुकून, त्यांचा रंग फिका पडून वाळून गेली होती. आमच्या घरात दुःखाचं सावट पसरलं होतं, ज्यामुळे आधीच शांत असलेले रहिवासी आणखीनच शांतावले होते.
मी दगडाच्या बाकावरून शांतपणे उठले आणि आठवणीने दुकानातून चहासाठी दूध नेलं.
***
अम्मा तिच्या बेडरूममध्ये माझ्या डोक्याला खोबरेल तेल लावून मालिश करत होती. केस नियमित धूत असूनही टाळू कोरडी पडतेय, अशी मी तक्रार केली होती. मी केसांना तेल लावत नसल्यामुळे असं होतंय, असा अम्माचा दावा होता. मी तिच्याशी पूर्णपणे सहमत नव्हते, तरी तिला तेल लावू देत होते. माझ्या केसांतला अम्माच्या उबदार बोटांचा तो हलका, मायेचा स्पर्श मनाला खूप सुखावून जात होता. माझ्यासमोरच्या भिंतीला लागून असलेल्या ड्रेसिंग टेबलकडे पाहून माझ्या काळजात वेदना दाटून आली. बाबांचा केसांचा ब्रश अम्माच्या ब्रशच्या शेजारी तसाच जागेवर होता; अम्माच्या परफ्यूमच्या बाटलीशेजारी त्यांची अर्धी वापरलेली अत्तराची बाटली; ईशाने पहिला पगार मिळाल्यावर भेट दिलेलं त्यांचं स्वॉच घड्याळ; अम्मा-बाबांच्या लग्नातला फ्रेम केलेला फोटो; आणि आम्ही सगळे लहान असतानाचा एक फॅमिली फोटो. त्यांच्या घरातल्या चपला पलंगाच्या त्यांच्या बाजूला तशाच शाबूत होत्या. एकेकाळी रोजच्या वापरात असलेल्या या वस्तू पाहून माझं मन भरून आलं.
“अम्मा?”
“ह्म ?”
“आपल्याला सोडून गेलेल्या माणसांच्या वस्तूंचं शेवटी काय होतं ?”
मला जाणवलं की तिच्या हातांची हालचाल मंदावली, पण पूर्णपणे थांबली नाही. आमच्यामध्ये एक शांतता पसरली, जी बाहेरून येणाऱ्या मोटारसायकलच्या कर्कश आवाजाने अधूनमधून भंग पावत होती.
“काय झालं? तुला तुझ्या बाबांची आठवण येतेये का ?”
“तुला येते ?”
“कधीकधी येते, पण मला ते रोजच आठवतात,” तिचा आवाज जड झाला होता, “त्यांचा टूथब्रश अजूनही बाथरूममध्येच आहे, त्यांचा टॉवेल, रेझर आणि इतर लहानसहान वस्तूही आहेत. जेव्हा जेव्हा मी बाथरूममध्ये जाते, तेव्हा माझी नजर नेहमी आधी त्यांच्या टूथब्रशवरच जाते.”
“ते तुझ्याशी जसे वागले, त्यानंतर हे सगळं फेकून द्यावं, असं तुला वाटत नाही का ?”
“कधीकधी,” ती हसली, पण तिच्या हसण्यात प्रचंड वेदना होती, “जरी आम्ही आमचं बहुतेक आयुष्य अशा गोष्टींवरून भांडण्यात घालवलं, ज्या आता मला आठवतही नाहीत, तरी एक वेळ अशी होती जेव्हा आम्ही एकमेकांना आवडायचो. एका प्रकारे, त्यांच्या उरलेल्या वस्तू पाहून मला रोज त्यांच्या मृत्यूविषयी पुन्हा पुन्हा नवीन गोष्टी शिकायला मिळतात असं वाटतं. मला माहीत आहे की एक दिवस मला त्यांच्या बहुतेक वस्तू देऊन टाकाव्या लागतील, पण सध्या तरी मला त्या जशा आहेत तशाच राहू द्यायच्या आहेत.”
मी बाबांसाठी योग्य प्रकारे शोक व्यक्त केला की नाही, याबद्दल मला कधीकधी शंका वाटायची. अम्मा परिस्थितीशी चांगली जुळवून घेत होती. ईशासुद्धा. हाशिम कसा आहे, हे मला माहीत नव्हतं. आम्ही त्याच्याशी बाबांबद्दल बोललो, तरी तो काही बोलत नसे. तो मनातलं मनातच ठेवायचा. बाबांचा त्यांच्या मुलावर जास्त जीव आहे, याचा मला राग यायचा. माझ्या व्यवसायाला कमी लेखून आणि त्याची ईशाच्या व्यवसायाशी तुलना करून ते मला दुखवायचे. ज्या बागेत मी नेहमी जाते, त्याच बागेत आम्ही धावताना जेव्हा ते सात वर्षांच्या माझ्याबरोबर धावू शकले नाहीत, तेव्हा त्यांनी माझं मन मोडलं होतं. त्याच वेळी, जेव्हा ते दर आठवड्याला गुपचूप फक्त मला आवडणारी हिरवी सफरचंदं फ्रिजमध्ये ठेवायचे, तेव्हा त्यांच्या प्रेमाबद्दल माझ्या मनात आशा निर्माण व्हायची. माझं तोंड एकदम कडू झालं आणि बाबांच्या जाण्यानंतर पहिल्यांदाच माझ्या डोळ्यात मुके अश्रू दाटून आले.
मी माझा घसा साफ केला आणि विचारलं, “अम्मा, जो माणूस आपल्या शब्दांनी आणि कृतींनी आपल्याला दुखावतो, त्याच्यासाठी शोक कसा व्यक्त करायचा ?”
“त्यांना माफ करून.”
“आणि जर ते जड जात असेल तर ?”
“मग त्यांना मनातून मुक्त करून.”
बाहेरचा रस्ता नेहमीप्रमाणेच गजबजलेला होता. विक्रेते त्यांच्या स्पीकरवरून स्वस्त फुलकोबी आणि टोमॅटो विकायला मोठ्याने ओरडत होते. काठीने टायर बडवणाऱ्या मुलांचं खळखळून हसणं गल्लीत ऐकू येत होतं. मोटारसायकलींचा कर्कश आवाज सुरूच होता — वरच्या मजल्यावर कुणी आजारी आहे का, वृद्ध आहे का, एखादं बाळ आहे का… किंवा दोन स्त्रिया अजूनही शोकात आहेत का — याची त्यांना पर्वा नव्हती.
Image credit: Unsplash
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
