Skip to content Skip to footer

विहीर : एक अक्षय नायिका । राघवेंद्र श्रीकृष्ण वंजारी

Discover An Author

  • लेखक आणि अभ्यासक

    राघवेंद्र श्रीकृष्ण वंजारी हे फ्लेम विद्यापीठ, पुणे येथे संशोधन व विकास-केंद्रात कार्यरत आहेत. निसर्गविषयक लेखन हा त्यांचा आवडीचा विषय असून, ते सायकलवरून निसर्गभ्रमंती करतात.

ऋषभावती नदीच्या अभ्यासासाठी मला बंगलोरला जावं लागलं. ही नदी बंगलोर महानगराच्या मधोमध एका देवळात उगम पावते. सुमारे साठ किलोमीटर अंतराचा प्रवास करून तिला समांतर परंतु दुसऱ्या जिल्ह्यातून वाहणाऱ्या नदीला, अर्थात, अरकावतीला जाऊन मिळते. तत्पूर्वी काही अंतरावर ती एक छोट्याशा ओढ्याला, म्हणजेच सुवर्णमुखीला सोबत घेऊन अजून चाळीस किलोमीटर वाहून कावेरी नदीत सामावते. या संपूर्ण भौगोलिक परिसरात शेकडो गावं, हजारो वस्त्या, अनेक तलाव, अनेक टेकड्या, असंख्य लोक आणि त्यांची कौलारू घरं वसली आहेत. त्यांच्या गर्दीतून डोकं काढणारी सिमेंटची रंगीत घरं, डांबरी रस्त्याच्या बाजूला रेशमाची सुरवंट-काढणीसाठी तयार असलेली उभी ताटं, दुपारच्या वेळी जनावरांच्या गोठ्यासमोर पडलेला हिरव्यागार वैरणाचा भारा, असं चित्र वाड्या-वस्त्यांमध्ये सहज दिसतं.  सुरुवातीच्या दिवसांत मी प्राथमिक माहिती मिळवण्याच्या हेतूने ‘अखेरवाडी’ या गावात पोहोचलो. तेव्हा दुपारची वेळ होती. तासाभराच्या बस-प्रवासाने काहीशी दमछाक झाली होती. तहान भागवण्यासाठी कुणाकडे तरी पाणी मागण्याच्या उद्देशाने मी एका जुनाट घरासमोर गेलो. दार उघडंच होतं. पाण्याची रिकामी बाटली हातात घेऊन मी आत आवाज दिला — 

“कुणी आहे का ? आतमध्ये कुणी आहे का ?”
काही वेळ प्रत्युत्तर आलं नाही. 
मी पुन्हा दाराची कडी वाजवत हाक दिली — 
“अम्मा आहात का आतमध्ये ? थोडं पाणी हवं होतं.”
थकलेल्या स्वरात आतून फक्त आवाज आला, “कोन हाय ?”
बाहेरच्या उन्हामुळे घराच्या आत फक्त अंधार दिसत होता.
एक वृद्ध व्यक्ती सावकाश चालत आली, त्यांनी मिचमिच्या डोळ्यांनी मला पाहिलं. हातातली बाटली पुढे करत मी पुन्हा विचारलं, “थोडंसं पाणी मिळेल का ?”
“हां, हां, दितू, बस बस.” आजोबा उत्तरले. 
मी ओट्यावर बसलो. ते घरात वळले आणि तांब्यात पाणी घेऊन आले. 
भरलेला तांब्या त्यांच्याकडून घेता घेता मी म्हणालो, “मी पण घेऊन आलो होतो, पण इथे येईपर्यंत संपलं.”
मी पूर्ण पाणी प्यालो.  त्यांनी माझ्या तहानलेल्या चेहऱ्याकडे पाहत विचारलं, “अजूक दिऊ ?” माझी तहान भागली होती, मला बाटली भरून घ्यायची होती.
“हो !” मी आणखी पाणी मागितलं.  
ते पुन्हा काठी टेकवत टेकवत पाणी आणायला आत गेले. 
मी हापकत हापकत माथ्यावरचा घाम पुसू लागलो. पायांतले बूट काढले. अडगळीत का होईना, काही क्षण विसाव्याचे वाटत होते. 
आजोबा आतून येईपर्यंत मी चौतर्फा नजर फिरवू लागलो. आसपास कुणीच दिसत नव्हतं. काही दारं उघडी, तर काही बंद होती. तितक्यात, मी इथे का आलोय, हा प्रश्न माझ्या डोक्यात आला. गावाची माहिती तर हवी होती, परंतु इतक्या बिऱ्हाडांमध्ये कुणी दिसत नसताना कुणाला कसं विचारावं, सुरुवात कुठून करावी, हे कळेना.  तितक्यात आजोबा पाणी घेऊन आले. मला हायसं वाटू लागलं. पाण्याची बाटली भरायला सुरू केली.  आजोबांनी मला भरलेल्या स्वरात विचारलं, “कुठं चाललाय म्हणावं ?”
“कुठं नाही, याच गावी आलो होतो,” मी उत्तरलो.  
“काय यापार ?” 
“नाही, नाही. मी कोणता व्यापार करत नाही.”
हिथं कोन सोयरं हाय ?”
“नाही, आजोबा. मी बंगलोरहून आलोय. मी एक विद्यार्थी आहे. तुमच्या गावाचा, शेतीचा आणि नदीचा अभ्यास करतोय. म्हटलं, बघावं, तुमचं गाव कसं आहे ? गावातली माणसं कशाची शेती करतात ? कशी करतात ?”
“बरं, बरं, पण हिथं काय मिलनार ?”
“आता तर सर्वप्रथम तुम्ही मिळालात मला,”  मी मिश्किलपणे त्यांना जवाब दिला.
त्यांनी समाधान दाखवत मान हलवली. 
“काय हो ! तुम्ही शेती करता का ?”
“करतू की, पन तू हे समदं हामाला इचारून कुनाला जाऊन सांगतो ? सरकारला वर्दी देतो का ?” आजोबांच्या शब्दांत काहीसा संशय जाणवत होता. 
मी लगेच म्हणालो,      
“नाही, नाही.  मी सरकारी खात्यातून आलो नाहीये. मी विद्यापीठात शिकतोय अजून. शेतीबद्दल अभ्यास करत होतो, म्हटलं, इथे येऊन बघावं प्रत्यक्षात, म्हणजे शेती आणि शेतकऱ्याचं जीवन आणखी जवळून पाहता येईल.”
अस्सं !” ते उत्तरले. 
माझ्याविषयी त्यांनी जाणून घेतल्यावर आमचा प्राथमिक परिचय सुरू झाला. मी त्यांच्याविषयी आणि त्यांच्या गावाविषयी विचारू लागलो. पन्नास-एक घरांचं गाव होतं. याचं एक वैशिष्टय म्हणजे या गावाचं नाव — अखेरवाडी. या नामकरणामागे काही इतिहास असावा. याविषयी सांगताना आजोबांनी गावाच्या स्थापनेच्या इतिहास-वर्णनाला सुरुवात केली —  “लई वरीस झालं असंल, चार डोसकीमागली पिढी या गावात पयल्यांदा ऱ्हायाला आलतं. माझा पणजुबा मैसूर महाराजाच्या संस्थानात सेनापती हुता. सैन्याच्या एका तुकडीसंगुट ती हिथं, नदीपतूर गस्त घालायला यायचे. घोड्यावर त्यांचा दौरा हुता. सारखंसारखं यायची ती. त्या लोकांचा मूळ जन्म उत्तर देशातला असला, तरी पन युद्ध करायला कट्टर हुती. बौडी धिप्पाड, मजबूत हुती.” त्यांच्या पूर्वजांविषयीची ऊर्मी आजोबांच्या चेहऱ्यावर साफ झळकत होती. यावर विश्वास ठेवणं मला थोडं कठीण जात होतं. परंतु त्यांच्या शब्दांतला आत्मविश्वास खरोखर कमालीचा रोचक होता.  मी कुतुहलाने ऐकू लागलो.   

“त्यांच जगनंच लई भारी म्हना. नंतर-नंतर युद्ध संपलीच की. इंग्रजांचं वजन ह्यांच्यावर लई वाडू लागलं. मग तवा ती सगळी सैनिक मंडळी हिथं स्थायिक झाली.  परगण्याच्या शीमेवरचं सर्वांत कोपऱ्याचं आणि अंतिम ठिकान असल्यामुळं या वस्तीला ‘अखेरवाडी’ म्हणत हुते. आम्हीबी तेच म्हणू लागलो. सरकारी दप्तरात तसंच आलं.”
“वाह ! अगदी संस्थानाच्या भौगोलिक रचनेप्रमाणे समर्पक नाव दिलं हो.”  मी प्रतिक्रिया दिली आणि पुढे विचारलं, “तुमच्या आजोबांचं नाव काय ?”  
ते हसत उत्तरले, “सेनापती कुशल.” 
आपल्या कोमेजलेल्या आवाजात एक नवी उमेद आणत त्यांनी त्यांच्या पूर्वजांचं नाव अगदी अभिमानाने सांगत हातातली काठी जोराने जमिनीवर टेकवली. 
“तुम्हाला इतकं सगळं कसं काय माहीत हो ? ही तर खूप जुनी घटना आहे, तुमचा जन्म झाला नसावा तेव्हा.”
अभ्यासकाची बुद्धी थोडी संशयी असते, म्हणतात, याची माझा हा अल्लड प्रश्नच साक्ष देतो. 
आजोबा आपल्या पसरट ओठांनी हसतहसत उत्तरले, “अरं बाळ, मला हे माझ्या आजीआजोबानी सांगितलं. जेवढं मला आठवतं, ते मी तुला सांगतोय.”
“छान ! आणखी काय काय आठवतं तुम्हांला ? सांगा ना.”  
“सैनिकांचा परवास कमी झाल्यावर ती टुळी  हिथंच वसली. जगण्यासाठी शेती करू लागली. जंगलाला जपनारी माती, वरीस न् वरीस मोठा पाऊस, आणि सारखी वाहनारी ऋषभावती. जुन्या काळात परिस्थिती चांगली हुती.”  
“तर आजोबा, जर वर्षभर पाणी नदीला होतंच, तर विहिरी का खणल्या हो ?” मी विचारलं. 
आजोबा यावर म्हणाले, “नदीला पूर आल्यावर लाकडाची घरं वाहून जायची. संसार उघड्यावर पडत हुता.  तवा नदीपासनं दूर उंचावर वस्ती बनवल्या. वाडी उंच भागात आल्यावर पुराचा ताप तर नाय, पण उन्हाळ्यात शेतीसाठी काय करनार ? प्यायला पानी कसं मिळावं ? तवा जमीन खोदून पानी काढावं लागलं. नड पडली की माणूस कसंपण करतंयच की.” आजोबा धीरगंभीर विचारात बुडून गेले होते.  
“तवा राजानं पन आमच्याकडं पाठ फिरवली. नदी, नालं, वडं, तळी सुकली.  तवा भूमातेच्या पोटातनं पाणी काढू लागलो. जमिनीतल्या झऱ्यांना तोंड दिलं, तिलाच आज हीर म्हणतो.” 

संभाषणाचं वातावरण अगदी धीरगंभीर झालं होतं. त्यांच्या सांगण्यात उमेद आणि स्फूर्ती अगदी जोमाने उमटत होती. मी पुढे विचारलं, “गावकऱ्यांबद्दल काही आठवणी तुमच्या आजोबांनी सांगितलं का ?”
आजोबा म्हणाले, “गावात किती ! पंचवीस तीस झोपड्यां — लई झालं. पन खानाaरी तोंडं तीनपट हुती. लांबलचक शेतजमिनी, मानूस, आणि भूमातेमदी पानी देनाऱ्या या हिरीच हुत्या. बिनपान्यानं तहानलेली पोरंबाळं, गुरंढोरं आणि शेती आभाळाकडं-धरणी मातेकडं बघायची, तवा हिरीच्या पान्यामुळं तर दोन घास पोटात जात हुतं.”  
“त्या वेळी एकच विहीर होती का ?” मी विचारलं. 
“हां, तवा तिकडची एक, नंतर एक-एक करत आठ हिरी काढल्या की. आमच्या काळात गाव मोठं झालं. घरं वाढली. अजून हिरी काढल्या. काही वाळून गेल्या, काही संपवल्या.” 
“आज किती विहिरी आहेत ?”
“फकस्त दोन.”
“फक्त दोन विहिरी ? तुम्ही तर तेव्हा आठ म्हणालात !”
“व्हय, पन ती माझ्या आजोबाच्या काळात. आता दोनच हिरी उरलेत. ही एक अन् खालच्या वाड्यातली एक.”
“तिला पाणी आहे का ?”
“व्हय, लई छान हाय,” आजोबांनी नवलाईने सांगितलं.  
“तर त्या सहा विहिरींत पाणी नाही का ?” मी इतर विहिंरींची चौकशी केली. 
“पानी ! हा हा हा ! पानीच काय, आज ते पण न्हायती.”
“म्हणजे ?” मला समजलं नाही. 
“कसं काय म्हंजी ? जागा-मालकांनी हिरी बुजवल्या. ज्यांच्याकडं बक्कळ पैसा हाय, त्यांनी जमिनी घेतल्या, घरं बांधली, पण पाणी शेंदायचं बळ अंगात न्हायी. बोर लावून मिशिनीनं पानी उपसतात. तर त्यांना हीर कशाला लागती !” 
आजोबा पुढे सांगू लागले, “त्या घरच्या पूर्वजांनी समदी आळी पानी पील म्हनून हीर केली. पुढल्या पिढीने ती चार दारांमधी वाटली, आणि आजच्या पिढीने तिला मातीमोल केलं.” 
“पण त्याला काहीतरी कारण असेल ना ?” आजोबांच्या चर्चेत मीसुद्धा रमून गेलो.  
“कारन कशाला पायजे ? त्याची मर्जी ती. आपण विचारनार कोन ?” आजोबा मोठ्या आवाजात उत्तरले. मी चरकलो. 

काही क्षणांतच भानावर आल्यावर समजलं की विहिरींच्या चरित्रात आम्ही दोघंही खूपच खोलवर गेलो होतो. आजोबांनी सुद्धा समाधानानं हळुवारपणे मान डोलावली, झुकलेल्या खांद्यांनी काठी जवळ घेऊन माथा मनगटावर टेकवला. काही क्षण आम्ही दोघंही शांत होतो. 
“पानी जवा पैशानं बाजारात इकायला आलं, तवा या नैसर्गिक संपत्तीला कुनी किंमत देत नाय.” आजोबांच्या मनात बोलण्यासारखं बरंच काही होतं. खूप दिवस तटून राहिलेल्या झऱ्याला रस्ता मिळावा तसं आजोबा व्यक्त होत होते.  
“तुम्हांला ती जागा चांगलीच आठवत असेल ना ? सांगा ना, आजोबा. तिथं आणखी काय काय होतं तुमच्या काळात ?” मी त्यांच्या जीवनकथेचा आणखी एक भाग वाचण्याचा प्रयत्न करू लागलो.  
“मी यवडं वरडून का सांगतोय ! त्या घराचा मालक दुसरा-तिसरा कोन नाय, आमचा चुलताच हुता. समद्या पोरांना लई जीव लावायचा. काठच्या शिवरीवरून हिरीत उड्या ठोकताना लई वरडायचा. पन आमच्या काळजीपोटी वरडायचा. कुठं लावून घेतलं, हातपाय मोडला तर ! काय कमी-जादा झालं तर !” 
आजोबा खिन्न नजरेने त्या बंगल्याकडे पाहत इतिहासाची पानं पलटू लागले.  “मला पवता येत नाय, मला नकं, मला भ्या वाटती नाना,” असं मी घाबरत घाबरत वरडत हुतो. दोन्ही हातांनी मला उचलून त्याने हिरीत टाकलं हुतं. अन् मी पवाला शिकलो.”
बालपणातील छोटीशी आठवण आजोबांच्या गालांवर हास्यछटा उमटवून गेली. त्यांचे सुरकुतलेले डोळे आणखी बारीक झाले.  
“गावच्या जत्रेला पण ह्या दोनच हिरींचं पानी चालतं. त्या पल्याडल्या वस्तीची सुमती हितंच यायची कापडं धुवायला आणि मी तिला नजर चुरून चुरून बघायचो.” अधूनमधून गरजणारे आजोबा इतके रसिक असतीलसं मला वाटलं नव्हतं. 
ते पुढं म्हणाले, “या हिरीच्या लई आठवनी हायत. आमचं समधं जिनंन यांच्या सोबत तर हुतं. दिवस उजाडल्यापासून ते इदुळा हुईसपतूर काम चालायची. शेतीचं काम पण हिरींवरच भागायचं. कवा उन्हाळ्यात कुरडी पडलीच, तर मी स्वतः आत उतरून शेवाळ काडून साफ करत होतो. त्या झऱ्यांमुळं तर स्वच्छ पानी येतं आन तीच प्यायला दातापतूर आलं.”

संवादाचं वातावरण मोकळं झालं आणि मला बोलायची संधी मिळाली.  “आजोबा, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. परंतु प्रश्न असाही येतो की, जशी तुमच्या चुलत्याने आणि त्याच्या पुढच्या पिढीने विहीर बुजवली, मात्र तुम्ही विहीर अजून का जपून ठेवली आहे ?”
आता मात्र आजोबांनी माझ्या नजरेला नजर मिळवली. थकलेली नजर तेजू लागली. मी थोडासा गंभीर झालो. ते स्वतःचा तोल सावरत गावाच्या मागच्या बाजूला जाणाऱ्या वस्तीकडे चालू लागले. दोन पावलं जाऊन थांबले.  
“चल माज्यासंगं,” त्यांनी मला बोलावलं. 
मी थोडासा भेदरलो. नवनवीन माहितीने माझ्या डोक्यात विचारांचा गुंता केलाच होता, त्याबरोबर इथल्या गावकऱ्यांचं जीवन विहिरीशी कसं जोडलं गेलं आहे हेही समजून घेण्याच्या प्रयत्नात मी होतो.  

घराजवळच्या विहिरीसमोरून आम्ही मागच्या आळीत गेलो. तिथून पुढे चालू लागलो.  एकदोन घरांतून म्हाताऱ्या बायका, चेहऱ्यावर एक साहजिक प्रश्न घेऊन आम्हां दोघांकडे पाहत होत्या. गोठ्यात बांधलेल्या संकरित गाई हिरव्या गवतावर ताव मारण्यात व्यग्र होत्या. आळी ओलांडून उतारावर आलो. मी नदीविषयी जाणून घ्यायला आलो होतो. कुणाला विचारावं या संभ्रमात असताना आजोबा मला ऋषभावतीच्या पात्रात घेऊन आले. नदीतीरावर आजोबा थांबले. मी दोन पावलं पुढे जाऊन थांबलो. काही क्षण आजोबा शांतच राहिले. ते काहीच बोलले नाहीत. आपल्या थकलेल्या शरीराने, काठीचा आधार घेत आणि मानेचं अवसान झेलत ते नदीपासून ते दूर पसरलेल्या शेतजमिनींना, क्षितिजापर्यंत टेकलेल्या नारळाच्या झाडांना हळुवारपणे पाहू लागले.  
“बघितलं !आजोबा प्रवाहाकडे पाहतच प्रश्नार्थक नजरेने उद्गारले. 
“हो !”
ते पुन्हा उद्गारले, “काय !?”
“नदी. ऋषभावती नदी आहे ना ही.”
“नाय, हामी आता याला नदी म्हनत नाही.” 
“तर मग काय म्हणता ?”
“गटार !” 
“गटार ?! अहो, पण ही नदी आहे ना ? आणि नदीला तर आपल्या समाजात किती आदराचं स्थान आहे.”
“एके काळी नदी हुती. एके काळी आमची कावेरीच.” 
“मग आता काय झालं ?”
“हे तुम्ही हामाला विचारताव ? नदीबद्दल सलगी केली, तुमी शहरात ऱ्हाणारे, आदर हामाला सांगता ?”
मी त्यांच्यासमोर ओशाळलो. मान खाली घातली. वयाने, अनुभवाने ते मोठे होते. मी यापुढे काय बोलणार ? आजोबांनी नदीला गटाराची उपमा देऊन जणू माझे डोळेच उघडले. 
‘गटार’ म्हणताच, नदीचं संपूर्ण चित्रच माझ्या नजरेत बदललं. काठावरची ती घाण, काळ्या रंगाचं पाणी, दगडधोंड्यांवर जमलेला प्लास्टिकचा कचरा, दुर्गंधी, दगडांवर आपटून खळखळत्या पाण्याने तुंबलेला फेस, जोराचा वारा आला की तो फेस आजू बाजूला असणाऱ्या लोकांच्या अंगावर उडायचा. तो फेस उडत जाऊन शेजारच्या जमिनीतील पिकाला, कणसांना आणि कोवळ्या भाताला माखत होता. आता मात्र मी माझ्या खिशातून हातरुमाल काढून नाकातोंडावर धरला. मी पूर्णपणे स्तब्ध झालो. याला खरंच नदी म्हणावं की नाही ? की आणखी काही म्हणावं ? काही सुचेनासं झाल्याने मी अस्वस्थ होऊन आजोबांना पुढे विचारलं, 
“तुम्ही हे पाणी वापरता का ?” 
“नदीच्या या अवस्थेला तुमी शहरातले लोकच कारण !”  त्यांनी माझ्याकडे बोट करून सबंध शहरी समाजाला उद्देशून दोष दिला.  
“ही नदी महानगराच्या मधी शंकर भगवानाच्या पवित्र देवळातून उगवते, तवा ती शुद्ध अन पवित्रच असती. पन तिकडून फुढं वाहून भाईर येती, तवा तिचं पावित्र्य तुम्ही लोक लुटता.”  
आता तर मी अक्षरशः गारठूनच गेलो.  आजोबा पुढे म्हणाले, 
“घरातल्या कचऱ्यापासनं गल्लीबोळातल्या मोठ्या कचऱ्यापतूर घान पानी नदीत सोडता, तवा तुम्हांला नदीची रूपं आटवत न्हाईती. देवपूजेचं सामान, हागणदारीचं पानी तर सोडतावंच, ते कमी म्हनून, कारखाने पन ऐन काठावर बसवलेत. अरे ! बारक्याबारक्या तळ्यांना पन गिळून त्या कारखान्यांचं ईष मातीत मुरलंय, जमिनीच्या पोटातलं पानी पन ईषारी झालंय.” 

आजोबा ज्या पद्धतीने मला समजावत होते, त्यांच्या प्रत्येक शब्दाचं एक-एक चित्र माझ्या नजरेतून स्मृतीमध्ये जसंच्या तसं उमटत होतं. मी त्यांच्या प्रत्येक आरोपाची  पडताळणी करत होतो, खात्री करून घेत होतो.  नदीचं पात्र आणि प्रवाह खूप गढूळ झाला होता. नदीतून उकिरडा वाहतोय की उकिरड्यातून नदी ? दोघांना वेगळं करूच शकत नव्हतो. आजोबांनी नदीकडे पाठ फिरवली. ते घराकडे परत चालू लागले आणि मीही त्यांच्यामागे चालू लागलो.  वास्तविक पाहता, मला तिथून कधी एकदा निघून जाता येईल, असं वाटत होतं.  इतक्या असह्य वातावरणात हे गावकरी तरी इथे कसे राहत असतील ? यांचं आरोग्य कसं असेल ? मनात सारे प्रश्न तर होते, परंतु आजोबांनी शहरवासीयांसाठी लावलेल्या आरोपीकक्षात त्या वेळेला मी उभा असल्याने पुढे काहीही विचारण्याचे धैर्य मला झालं नाही. परतून येताना आजोबा घरामागे असलेल्या गाईच्या गोठ्याजवळ थांबले. अगदी कृतज्ञ आवाजात म्हणाले, 
“आज हामी जित्ते हाय तर त्येला कारण ही जनावरं आमच्याकडं हायती म्हनून. दुधाच्या धंद्याने हामचं जिनं चालवलंय.”
मी खालच्या आवाजात म्हणालो, “कसं काय ?”
“तुमच्या त्या गढूळ पान्यानं कुठलंच पीक धड उगवून येत नाय. आलंच तर रोगराई आणि किडेमकोडे सोडत नायत. उरलंसुरलं तर बाजारापर्यंत जाऊ शकत नाय.  नुसतंच गवत उरतं. तीच गवत गायम्हशी खातात. त्यांचं दूध हामी इकतो, त्या कमाईवर तर हामच्या संसाराचा गाडा चालतो,” असं म्हणून आम्ही दोघंही पुन्हा घरासमोरच्या विहिरीजवळ आलो.  
आम्ही घराजवळ आलो, तेव्हा समोर आजी उभ्या होत्या.  
“कुठं गेला होता वं ? अन् ही कोन म्हनायचं ?” 
“हे बेंगलोरवरन आलंत आपलं गाव बगायला.” 
आजोबा आजीकडे हात करत म्हणाले, “ही हामची मंडळी.” मी आजींना नमस्कार केला. 
त्यांनी मला विचारलं, “बगितलं का मग ?” 
“आम्ही मागं तिकडं नदीकडे गेलतो.” 
आजी आजोबांकडे पाहत म्हणाली, “सगळं सोडून त्या घानीत काय ठेवलं हुतं ?”
“अगं, ते नदी बघायलाच हितं आलंय.” 
“होय, आजी. मी इथं शेती आणि नदी बघायला आलो होतो.” 
“का ? जमीनबिमीन घ्याची व्हय ?” 
मी हसत हसत म्हणालो, “नाही, नाही. मी एक विद्यार्थी आहे. कॉलेजमध्ये शिकतोय. या नदीविषयी अभ्यास करत होतो, म्हटलं, आज प्रत्यक्ष जाऊन पाहावं. इथं आल्यावर आजोबांशी परिचय झाला.”
“बरं बरं, बेस ! जेवला का तू ?”
“मी खाऊन आलोय. तुमचं नाव काय ?”
“सुमती.” मला एकदम आठवलं, विहिरींच्या आठवणींचं गाठोडं उघडताना आजोबा बहुतेक यांचाच उल्लेख करत होते असावेत. त्याची खात्री करण्यासाठी मी पुढे विचारलं, “आजी, तुम्ही पण या गावचेच का ? का लग्नानंतर सून म्हणून या गावात आलात ?”
या प्रश्नाने आजीच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं.  
त्या उत्तरल्या, “माझं माहेरबी हीच अन सासरबी हीच.” या उत्तरावरून आजोबांच्या आठवणीची पुष्टी झाली.
“कसं चाललंय शेतीचं काम ?”
“अरं देवा ! या वयात काय हुतंय ! जरा रान हाय, पन दोन पोती नाचनीला दुसऱ्याला कराला दिली. दोन गाई हायत्या, तेवढं राखून संसार चाललाय.” 
विषयाची गंभीरता, वयाची मर्यादा आणि उपलब्ध पर्यायांना कसं व्यवस्थापित केलं याचं दर्शन इथं घडलं. 

आजींनी मला घरात बोलावलं. प्यायला पाणी दिलं.  त्यांचं घर पाहण्याची संधी मला मिळाली. माझ्या उंचीइतक्या मातीच्या भिंती, चुन्याची सारवण, वाकलेल्या बांबूवर कौलारू छत, त्याच रंगाच्या फरशा, भिंतीवर त्यांच्या पूर्वजांची दोन हस्तचित्रं, आणि टीव्हीजवळ छोट्या मुलीचा रंगीत फोटो यांनी त्यांचं घर सजलं होतं. असा जेमतेम वस्तूंनी त्यांचा संसार बहरला होता. खाली बसल्यानंतर गार फरशीच्या स्पर्शाने चर्चा आणखीनच आल्हाददायक वाटू लागली. 
भिंतीवर जुन्या चित्राकडे बोट करत मी हळुवार आवाजात विचारलं, “हे कोण?”
आजोबांनी आणि आजींनी एकदम उत्तर दिलं, “हीच माझे आजोबा.” आजोबा म्हणाले, तेव्हाच “हे यांचे आजोबा,” असं आजी म्हणाली.
“आजोबांनी तुम्हांला मस्करीत विहिरीत टाकलेलं, हेच का ते ?” 
“व्हय, व्हय,” आजोबा हसत हसत म्हणाले आणि होकारार्थी मान हलवली. 
“आणि त्यांच्या बाजूला ?” 
“ती माझी आज्जी.” छोट्या मुलीच्या फोटोकडे बोट दाखवत मी विचारले, “आणि ही कोण आजोबा ?” 
ते हसले आणि म्हणाले, “ती हामची आई.” 
आजी पुढे म्हणाल्या, “पोरगा शहरात असतो. कवातरी येतो, तवा भेटायला मिळतं. या वयात, आणि जनावरांना सोडून कुठं जाता येत नाय.”
“ते पण तिथं शेती करतात का ?” मी विचारलं. 
“छे ! छे ! नाय, फॅक्टरीत कामाला हाय. शहरात त्याची सासरवाडी हाय, तिकडंच राहतो. नात शाळेला जाती म्हनून यायला व्हत नाय.”
“त्यांना शेती करायला आवडत  नाही का ?” 
“अरं देवा ! शेतीचा वनवास कुनालाच नको रं बाबा. हामचा तरास त्याला नको, सुखात राहू दे, म्हनून चांगलं शिकिवलं, अन् आमचं गाव सोडून तिकडं जाऊन राहिला.”
या चर्चेत आजोबांचा चेहरा काहीसा हिरमुसला. ते न बोलताही त्यांच्या मनातली नाराजगी त्यांच्या डोळ्यांत दिसत होती. ते काहीच बोलले नाहीत.   
“ती म्हनतंय, या घान पान्यानं काय शेती हुती ? तीबी खरंच हाय न्हवं ! या पान्यात खान्यासाठी भात पेरावं तर येत नाय. भाजीपाला केला तर जळून गेला. ऊस उगवलं तर जवळ कारखाने नाहीत. बारीकसारीक पिकाला मजूर नाय. असंल तर मजुरी परवडत नाय. काय पेरावं, काय उगवावं, अन् काय खावं, सांग.”
मी गंभीररीत्या ऐकत होतो. आजी शेतकऱ्यांच्या जीवनातील समस्या उलगडत चालल्या होत्या. त्या नदीच्या पाण्याविषयी बोलत होत्या.
आजी पुढे म्हणाल्या, “लय दिस पोरांची लग्नं होत नव्हती. पोरीकडली मानसं मनायची, ‘आमची पोर हितं दिली, तर या घान पाण्यात काम करावं लागंल !’ म्हणून लोक नवरी द्यायला म्हागंफुडं बघत होते.” प्रदूषणाच्या भयानक कथेचा माणसाच्या सामाजिक जीवनावर किती खोलवर परिणाम होतो याचं एक मार्मिक उदाहरण सुमती आजीने माझ्यापुढे ठेवलं होतं.
“किती वर्षं झाली असतील, असं प्रदूषित पाणी येत आहे ?” 
“लई वरीस झालं ना वं ?” आजोबांकडे खुणावत त्या म्हणाल्या, “पंधरा-ईस वरीस झालं आता असलं पानी येतंय.”
“पन आदी पानी लई भारी याचं. पान्यात आठाने पडले तर डोळ्याला दिसाचं.” आजी आता नदीच्या इतिहासात पदार्पण करत होत्या. मी विचारलं, “तेव्हा तर शेती चांगली असेल ना हो ?” 
“सोन्यावानी पीक घेतलो हामी. हितंच साखर-कारखाना व्हता. ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टर ऊस पिकायचं. पावसाळ्यात तर पंधरा-ईस पुती तांदूळ आन् उन्हाळ्यात पाच-धा पुती नाचनी व्हायची. तवा जमीनबी जादा हुती. वाटनी झाल्यावर कम झाली.”  
मी कुतूहलाने विचारलं, “गूळ पण बनवत होता का ?” 
त्यावर आजोबा म्हणाले, “व्हय, आमच्या वाडीत धा-पंधरा घुराळं  हुती. हामीई सवता  घुराळ चालवलं आमचे वडील असताना. तोच आमच्या जीवनाचा खरा काळ हुता बघ.” आजोबांचा सुखावलेला चेहरा आणि तेजोमय डोळे यांनी हे खूप समाधानकारक सांगितलं की त्यांचा काळ म्हणजे त्यांच्या जीवनाला पूरक असणारी स्थिती तेव्हा कशी होती.  
“तर मग हे बदललं केव्हा ?” 
“जवा शहर मोठं झालं तवापासून नदीला गिरन लागलं, अन् हितल्या लोकांची शेती बुडाली.”
आजी मला म्हणाल्या, “तसं बघितलं, तर नदी कशी का असंना, आज आमचं तीच बघती. हामी तिला नाव ठिवतो, सिवासराप देतो. करनार काय ? आम्ही नावं ठूतो, पन  हामच्यावनी लई लोक तिच्यावर जगत हायती.”  
त्यांच्या शब्दांत एक मतितार्थ होता. पुढे आजीनी मला समजावून सांगत म्हणाल्या,  
“हिरींनी हामचा जीव वाचीवला. नदीला पानी नसताना कुटं जानार ?”  इतक्या सबंध चर्चेनंतर आजी पण ‘विहीर’ या विषयापर्यंत पोहोचल्या.  
मुलं आपल्या आईकडे कशी व्याकुळतेने बघतात तशा नजरेने आजोबा त्या विहिरीकडे बघत तिला हळुवार स्पर्श करत होते. दुसऱ्या बाजूने मी त्यांना आणि विहिरीच्या खोलीला निहारत होतो. त्या क्षणी परिसरात एक विचित्र गंभीरता पसरली होती. तळाला स्पर्श करून परतणारं पाण्यातलं प्रतिबिंब मला हे समजून सांगत होतं की आजोबांनी ही विहीर का बुजवली नाही. 
माझ्या भुवया उंचावल्या. 
“तुम्ही आजही विहिरीचं पाणी पिता ?”  
“हं कवा तरी, पन आता गावात टाकी आलिया न्हवं. तिचं पानी घेतू हामी. पन कायबी म्हन, पान्याची गुडी हिरीतच हाय..” 
मी घराच्या आतून अंगणातल्या विहिरीकडे पाहू लागलो. दोन क्षण घरात मौन होतं. तेवढ्यात आजीने मला केळी खायला दिली. मला आनंद झाला.  
मी विचारलं, “केळीचं झाड आहे का तुमच्याकडे ?” 
ते म्हणाले, “व्हय, देवपूजेला सकाळी काढलं हुतं. म्हाग झाडं हायती.”  
मी त्यातलं एक केळं आजोबांना देत होतो, ते मला म्हणाले, “तुम्ही खा, मला नकू. हामी रोजच खातो,” असं म्हणत आजोबांनी ते नाकारलं.
आजींनी पुढे विचारलं, “तुमचं गाव कुठलं म्हणलं ? आई, बाप, संसार ?” त्यांनी माझी सर्व विचारणा केली. त्यांच्या विचारण्यात कुतूहल तर होतंच, पण एक अदृश्य प्रेम असल्याचंही मला भासलं.  
मी निघण्याचा विचार केला. तेवढ्यात ते दोघं काळजीने म्हणाले, “दोन घास पोटाला खाल्लं असतं तर लई बेस झालं असतं.”  
मी हसत हसत म्हणालो, “तुमच्याशी भेटून, बोलून माझं पोट भरलं. तुम्ही जेवणापेक्षा तुमचा वेळ दिलात आणि महत्त्वाची माहिती दिलीत, ते माझ्यासाठी खूप आहे.” 
“त्यात काय मोठं हाय रं बाबा !” आजी म्हणाली.   
“मी पुन्हा येतोच की, परत आल्यावर मिळून जेवण करू.” 
आजोबा आणि आजी हसत हसत म्हणाले, “बरं, बरं.” 
मी आजी-आजोबांचा निरोप घेतला आणि घराबाहेर पडलो.

दिवस मावळतीकडे झुकत होता. काही क्षण मी पिंपळाच्या पारावर विसावलो आणि दिवसभराची ठळक निरीक्षणं टिपू लागलो. कल्पनेतल्या योजना, गोंधळलेले विचार, वास्तवातली दृश्यं, नदीला माता मानणाऱ्या समाजात जननी-पुत्राच्या दुरावलेल्या नात्याची व्यथा फक्त ऐकायलाच नव्हे, तर पाहायला सुद्धा मिळाली.  ग्रामीण शेतकऱ्याच्या नजरेत एक शहरी माणूस कसा गुन्हेगार असतो याची प्रचिती आली.  त्या दिवशीच्या नोंदवहीत मी अखेरची ओळ लिहिली — 

“जिच्या भेटीसाठी मी आज अखेरवाडीत आलो होतो, कदाचित तिला भेटलोच नाही. खऱ्या ऋषभावतीचा परिचय असणारं ते प्रत्यक्षदर्शी दांपत्यच नशीबवान. पण विहिरींनी मात्र गावकऱ्यांची, आपल्या मानसपुत्रांची आणि सखा शेतकऱ्याची साथ कधीच सोडली नाही, त्या युगायुगांच्या अक्षय नायिका झाल्या.”

छायाचित्रे सौजन्य: राघवेंद्र श्रीकृष्ण वंजारी

Post Tags

Leave a comment

Descoperă secretele unui trai sănătos și armonios cu noi! Aici vei găsi cele mai bune sfaturi de gătit, licehack-uri utile și articole despre grădinărit. Fii inspirat de natură și bucură-te de viață în plin! Økonomisk forklaring på, hvorfor markedsføring Descoperă secretele unui stil de viață mai sănătos cu lumea lifyhacks-urilor, rețetelor delicioase și articolelor utile despre grădinărit. Aici vei găsi tot ce ai nevoie pentru a-ți îmbunătăți viața de zi cu zi și a te bucura de alimente proaspete din grădină. Fii în pas cu cele mai bune sfaturi și trucuri pentru a-ți face viața mai ușoară și mai plină de savoare.