
गिरीश सामंत
गिरीश सामंत हे ‘दि शिक्षण मंडळ, गोरेगाव, मुंबई’ ह्या शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष असून, त्यांच्यापाशी बालशिक्षणाच्या क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा दीर्घ अनुभव आहे. मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत असतानाच्या काळात त्यांच्या पुढाकाराने गोरेगावात ‘डोसीबाई जिजीभॉय’ ही मराठी माध्यमाची बालवाडी, व त्यानंतर प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली. ह्या शाळा आज यशस्वी, पथदर्शी मराठी शाळा म्हणून ओळखल्या जातात. गिरीश सामंत ह्यांनी लोकशाही शिक्षणासारख्या नावीन्यपूर्ण शिक्षणविषयक संकल्पनांचा, शैक्षणिक प्रयोगशील उपक्रमांचा अभ्यास करून, दर्जेदार शिक्षण, शैक्षणिक धोरणे, शिक्षण-व्यवस्थापन अशा विषयांवर वर्तमानपत्रे, नियतकालिके ह्यांकरिता विपुल लेखन केले आहे. त्यांचे ‘वेध शिक्षणाच्या हक्काचा’ हे पुस्तक, आणि ‘शिकणारी शाळा – अभिरंग’ व ‘शिकणारी शाळा – बालरंग’ ही सह-संपादने हे ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. मराठी भाषाविषयक मौलिक योगदानाकरिता त्यांना मराठी अभ्यास केंद्रातर्फे ‘मराठी भाषा-आग्रही अधिवक्ता शांताराम दातार आणि रवींद्र सुर्वे पुरस्कारा’ने गौरविण्यात आले आहे.